इतिहासाच्या पानात हरवलेले आद्यक्रांतिकारक- नोवसाजी मस्के (हटकर नाईक) आणि योद्धे (१८१९)
'Major R. G. Burton' या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिले आहे कि, " नांदेड, परभणी आणि पैनगंगा नदीच्या पलीकडच्या भागात पण एक भयानक हटकर नावाच्या समाजातील लोक राहतात, त्यांनी २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्यांचा पराक्रमी सेनापती नोवसाजी नाईक याच्या नेतृत्वावर तिथे आहेत. नांदेड आणि बेरर जिल्ह्यातील पक्के किल्ले, गढी त्यांच्या ताब्यात आहेत."
१८१८ मध्ये मराठा साम्राज्य खालसा झाल्यानंतर हैद्राबाद सरकारने त्यांच्याविरुध्द बंड करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरवात केली. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील 'नोवाह' येथील हटकरांच्या एका गढीवर आकस्मिक हल्ला केला. नोवसाजी नाईक यांनी मोठ्या जोमाने लढा दिला. त्यांना अरबांची पण मदत मिळाली जे नागपूर सोडून हैद्राबादकडे जाणऱ्या रस्त्यातच होते. हा नोवाह गावचा वेढाच खूप दिवसपर्यंत चालला. हे रक्तरंजित युध्द जानेवारीच्या शेवटी संपले.
हे नोवाहचे युध्द ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले. या युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अति जखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. तसेच हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. ते युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंट मध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली.
तसेच या युद्धासंबंधीची काही इंग्रज अधिकाऱ्यांची पत्रे मिळाली आहेत ज्यामध्ये त्यांनी हटकरांच्या युद्धाचे वर्णन केले आहे आणि इंग्रजांना नोवसाजी मस्के नाईक आणि हटकर योध्यांचा किती दरारा वाटत होता हे पण दिसून येते.
हा सोनेरी अक्षरांनी लिहावा असा इतिहास, नोवसाजी मस्के नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी योद्धे आतापर्यंत सर्वार्थाने उपेक्षितच राहिले आहेत असेच म्हणावे लागेल, कारण राष्ट्रीय तर नाहीच पण राज्यातील इतिहास अभ्यासक्रमांच्या पुस्तकात देखील यांचा साधा उल्लेख नाही.हे आपले दुर्दैव्य म्हणावे लागेल.
Comments
Post a Comment